ग्रंथसमीक्षा: सुरश्री
ह्या मालिकेच्या मागच्या भागामध्ये आपण जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अल्लादिया खान ह्यांच्या आत्मचरित्राची समीक्षा पाहिली. खानसाहेबांनी गायनाची तालीम आपल्या कौटुंबिक परंपरेनुसार घेतली होती. त्यामुळे सुरुवातीला आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच गायनाची तालीम देण्याकडे त्यां चा जास्त भर होता. कुटुंबाच्या बाहेर इतर कोणालाही तालीम देण्याबाबत ते साशंक होते. ह्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची क्लिष्ट गायकी पेलू शकणारा आवाज आणि ती आत्मसात करायला लागणारी जिद्द बाळगणारी माणसे मिळ णे कर्मकठीण होते ! पण अशी एक शिष्या त्यांना लाभली, आचार्या सुरश्री केसरबाई केरकर ह्यांच्या रूपात ! खरेतर खांसाहेबांकडून तालीम सुरु करण्याआधी सुरश्रींनी काही निष्णांत गुरूंकडून शास्त्रीय गायकीचे धडे घेतले होते. एक चांगली गायिका म्हणून त्यांचे नाव ही झालेले होते. पण एका मैफिलीत आलेल्या अपयशाने त्यांना इतके अपमानित झाल्यासारखे वाटले की त्यांनी खांसाहेब...